कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बंगाल सरकारचा आक्षेप फेटाळून लावत आरएसएसच्या रॅलीला सशर्त परवानगी दिली आहे. या रॅलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बंगाल पोलिसांनी असे सांगून परवानगी नाकारली होती की, सध्या बंगाल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनद्वारे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा सुरू आहे आणि त्यामुळे लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी आहे. पण, रॅली शांततेत काढण्यात यावी आणि आवाज कमी ठेवावा, असे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
आरएसएसची रॅली रविवारी होणार असून हा कार्यक्रम फक्त १ तास १५ मिनिटे चालणार आहे, त्यामुळे कोणाचीही गैरसोय होईल असे न्यायालयाला वाटत नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले. रॅली शांततेत पार पाडून आवाज कमी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. येथील रॅलीनंतर मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रादेशिक नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि वर्धमान आणि आसपासच्या भागातील प्रमुख लोकांचीही भेट घेणार आहेत. आरएसएसचे सरचिटणीस जिष्णू बसू म्हणाले की, मोहन भागवत यांच्या दौ-याचा उद्देश हिंदू समुदायामध्ये राष्ट्रवादाची भावना वाढवणे, स्वदेशी चेतनेला प्रोत्साहन देणे आणि स्वावलंबी भारताची संकल्पना पुढे नेणे हा आहे.