रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. घरामधून एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. यानंतर रान्याला चौकशीसाठी डीआरआयचे पथक नागवारा येथील कार्यालयात घेऊन गेले. डीआरआयच्या हाती आलेल्या माहितीनुसार रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत असल्याचे कळले तेव्हा कारवाई करण्याचा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मागील काही काळापासून रान्याच्या हालचालींवर डीआरआयचे अधिकारी लक्ष ठेवून होते. प्रत्येकवेळी ती केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर पोलिसाच्या मदतीने तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडत होती. यामुळे रान्याने आतापर्यंत किती कोटी रुपयांची तस्करी केली आणि फक्त सोन्याची तस्करी केली आणि इतर वस्तूंचीही तस्करी केली याचा तपास सुरू आहे.
रान्याच्या तस्करीचा संबंध एका बड्या राजकीय नेत्याशी असल्याची चर्चा आहे. नेत्याच्या सूचनांनुसार सोन्याची तस्करी सुरू होती, असे समजते. या प्रकरणी संबंधित नेत्याचीही लवकरच डीआरआय चौकशी करण्याची शक्यता आहे.
सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपात रान्याला पकडण्यात आले. पण रान्याने वेगळाच दावा केला. मला सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले; असे रान्याने सांगितले. रान्याचे वडील आणि कर्नाटक पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाचे महासंचालक डीजीपी रामचंद्र राव यांनी माहिती मिळताच धक्का बसला, अशी प्रतिक्रिया दिली. रान्याचे लग्न झाले आहे आणि मागील अनेक दिवसांपासून ती आमच्यासोबत नाही त्यामुळे तिनं नेमकं काय केलंय आणि का केलंय या विषयावर मला बोलता येणार नाही; असे ते म्हणाले.