अमृतसर, तरणतारन, फिरोजपूर आणि फाजिल्का या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची कापणी पूर्ण करुन ४८ तासांत शेतजमिनी मोकळ्या करुन देण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थिती चिघळली तर सुरक्षा पथकांकडून काही दरवाजे बंद केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनीपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. ही बाब विचारात घेऊन सीमा सुरक्षा दलाने शेतकऱ्यांना कापणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील शून्य रेषेपासून भारतीय बाजूच्या सीमेवरील कुंपणापर्यंत शेतकऱ्यांची अंदाजे ४५ हजार एकर जमीन आहे. सीमा सुरक्षा दलाकडून आदेश येताच शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सैनिकांनी कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त यंत्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.
अवघ्या ४८ तासांत कापणी पूर्ण करणे हे काम अनेक शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. गुरांच्या चाऱ्यासाठी वर्षभराचे नियोजन कापणीतून केले जाते. अनेक शेतकऱ्यांसाठी अल्पावधीत काम पूर्ण करणे कठीण आहे. पण परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी युद्धपातळीवर कापणीची कामं हाती घेतली आहेत.
तीव्र उष्णतेच्या लाटेपूर्वी कामं पूर्ण करा एवढाच तोंडी आदेश आहे. पण या आदेशाचा काही जण वेगळाच अर्थ काढत आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. शेतकऱ्यांना कापणीसाठी डेडलाईन जाहीर करणारा कोणताही लेखी आदेश काढलेली नाही; असे सीमा सुरक्षा दलाकडून जाहीरपणे सांगितले जात आहे.