Rajnath Singh: भारताचे संरक्षणमंत्री गोव्यात, आयएनएस विक्रांतवरील नौसैनिकांचे वाढवले मनोबल

'भारत आता सहन करत नाही, भारत आता थेट प्रत्युत्तर देतो', आयएनएस विक्रांतवरून राजनाथ सिंह यांची गर्जना


भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आज शुक्रवार दिनांक ५ मे रोजी गोवा दौऱ्यावर आहेत.  यादरम्यान त्यांनी आयएनएस विक्रांतला भेट दिली, तेथील नौदल कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत, त्यांचे मनोबल देखील वाढवले.  राजनाथ सिंह यांनी नौदल कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हंटले, "आज आयएनएस विक्रांतवरील तुम्हा नौदल सैनिकांसोबत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. जेव्हा मी भारताच्या सागरी शक्तीचा अभिमान असलेल्या  या आयएनएस विक्रांतवर असतो, तेव्हा मला आनंदाबरोबरच अभिमान आणि आत्मविश्वास वाटतो की जोपर्यंत देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा तुमच्या मजबूत हातात आहे तोपर्यंत कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.  'विक्रांत' चा अर्थ अदम्य धैर्य आणि अजेय शक्ती असा आहे. आज, तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये उभे राहून, मला या नावाचा अर्थ प्रत्यक्षात अनुभवता येतो आहे.  तुमच्या डोळ्यातील दृढनिश्चय भारताची खरी शक्ती प्रतिबिंबित करते."


राजनाथ सिंह पुढे असे म्हणाले की, 'आज मी येथे केवळ संरक्षण मंत्री म्हणून आलो नाही, तर मी येथे एक कृतज्ञ भारतीय म्हणून आलो आहे. मी तुमच्या समर्पणाला सलाम करण्यासाठी, तुमच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी आणि तुमच्या कठोर परिश्रमांना सलाम करण्यासाठी आलो आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर, जेव्हा भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, तेव्हा आमच्या सशस्त्र दलांनी ज्या वेगाने, खोलीने आणि स्पष्टतेने कारवाई केली ते आश्चर्यकारक होते. यामुळे केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पोसणाऱ्यांनाही स्पष्ट संदेश मिळाला की भारत आता ते सहन करत नाही, भारत आता थेट प्रत्युत्तर देतो.'



ऑपरेशन सिंदूरमधील नौदलाच्या भूमिकेचे केले कौतुक


राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदलाच्या भूमिकेचे कौतुक केले, ते म्हणाले, "या संपूर्ण एकात्मिक ऑपरेशनमध्ये नौदलाची भूमिका गौरवशाली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जेव्हा हवाई दलाने पाकिस्तानी भूमीवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तेव्हा अरबी समुद्रात तुमची आक्रमक तैनाती, अतुलनीय सागरी क्षेत्र जागरूकता आणि सागरी वर्चस्व यामुळे पाकिस्तानी नौदलाला त्यांच्याच किनाऱ्याजवळ मर्यादित केले. ते खुल्या समुद्रात येण्याचे धाडसही करू शकले नाहीत. ". ते पुढे असे देखील म्हणाले की, अल्पावधीतच आपण पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि त्याचे हेतू नष्ट केले. आपला हल्ला इतका जोरदार होता की पाकिस्तान संपूर्ण जगाला भारताला थांबवण्याची विणवण्या करू लागला. शेवटी, आपल्या स्वतःच्या अटींवर आपण लष्करी कारवाई थांबवली, मी पुन्हा एकदा तेच म्हणतोय. आपल्या सैन्याने अजूनही त्यांचे हात वर केलेले नाही, आम्ही आमचे सामर्थ्य दाखवायला सुरुवातही केली नव्हती.


राजनाथ सिंह म्हणाले की, दहशतवादी हल्ल्याच्या ९६ तासांच्या आत, समुद्रात तैनात असलेल्या आमच्या वेस्टर्न फ्लीट जहाजांनी पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे आणि टॉर्पेडोचे अनेक यशस्वी गोळीबार केले, जे आमच्या प्लॅटफॉर्म, सिस्टीम आणि क्रूची लढाऊ तयारी दर्शवते. या लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांनी शत्रूविरुद्ध आमचा हेतू आणि तयारी देखील दर्शविली आणि यामुळे शत्रू बचावात्मक स्थितीत आला.



भारतीय नौदलाच्या केवळ तयारीनेच शत्रू घाबरला


ते म्हणाले की, आपल्या सैन्याची आगेकूच आणि विक्रांत कॅरियर बॅटल ग्रुपच्या फोर्स प्रोजेक्शननेही आपल्या हेतू आणि क्षमतेचा प्रभावी संकेत दिला. तुमच्या या जोरदार तयारीने शत्रूचा आत्मविश्वास  मोडून काढला आहे. भारतीय नौदलाची केवळ तयारीच पाकिस्तानसाठी पुरेशी होती. या तयारीनेच शत्रू इतका स्तब्ध झाला की, पुढची कारवाई करण्याचीही गरज राहिली नाही. पाकिस्तानला भारतीय नौदलाची प्रचंड शक्ती, त्यांची लष्करी कौशल्ये आणि विध्वंसक क्षमता यांची केवळ जाणीव झाली नाही तर ते घाबरले सुद्धा.



"आपल्या नौदलाचे मनोबल समुद्रापेक्षाही खोल आणि विशाल आहे"


राजनाथ सिंह म्हणाले की, "तुमच्या उपस्थितीने शत्रूची हालचाल सुरू होण्यापूर्वीच थांबवली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. मी भारतीय नौदलाच्या प्रत्येक अधिकाऱ्याचे, प्रत्येक सैनिकाचे आणि प्रत्येक नागरिकाचे मनापासून अभिनंदन करतो. अलीकडेच मी आपल्या सैन्याच्या सैनिकांना भेटायला गेलो होतो. त्यानंतर मी भुजमध्ये आपल्या हवाई योद्ध्यांना भेटायला गेलो. आज मी आपल्या नौदलाच्या योद्ध्यांमध्ये आहे. मला असे वाटते की जर आपल्या सैन्याचे मनोबल डोंगरासारखे मजबूत असेल, जर आपल्या हवाई दलाचे मनोबल आकाशाच्या उंचीला स्पर्श करत असेल, तर आपल्या नौदलाचे मनोबल समुद्रापेक्षाही खोल आणि विशाल आहे. तुम्ही दाखवून दिले आहे की जमीन असो, आकाश असो किंवा समुद्र असो, भारत कुठेही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे."

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा