बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती: महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कोणताही कार्यकर्ता गाफील राहता कामा नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढून सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी विजय मिळवायचा आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. सुनेत्रा पवार यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते.


अजितदादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करताना शिंदे म्हणाले की, ही पोटनिवडणूक आपल्यावर दुर्दैवाने ओढवली आहे. त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट् हादरला. बारामतीसह संपूर्ण राज्याच्या विकासात त्यांनी भक्कम पायाभरणी केली. अनेक खात्यांची, विशेषतः अर्थ खात्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे पेलली. एक कणखर प्रशासक, धारदार संघटक आणि जनतेचा नेता म्हणून त्यांनी आपली छाप उमटवली.


ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम केले. मुख्यमंत्री असताना “माझी लाडकी बहीण” योजना राबवताना मोठे आर्थिक आव्हान होते. तरीही देवेंद्र फडणवीस, मी आणि अजितदादांनी ठाम निर्णय घेतला. अजितदादांनी आर्थिक ताळमेळ ढळू न देता ही योजना प्रभावीपणे राबवली. त्यांचा स्वभाव स्पष्ट, कणखर आणि तेवढाच आपुलकीचा होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी प्रचंड आहे.


सुनेत्राताईंनी या कठीण काळात जबाबदारी खंबीरपणे उचलली आहे. दुःख पचवून त्यांनी कामाचा वेग कमी होऊ दिलेला नाही. सांत्वन करणे सोपे असते, पण दुःख पचवून उभं राहणं कठीण असतं आणि ते त्यांनी करून दाखवलं आहे. पवार कुटुंबावर आलेल्या संकटात आपण सगळे त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. आज देवेंद्र फडणवीस, मी आणि सुनेत्राताई राज्यकारभार अधिक जबाबदारीने पुढे नेत आहोत. योजना सुरू ठेवतानाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखे धाडसी निर्णय घेतले जात आहेत.


या भागात अजितदादांनी उभारलेला विकास हा साक्षात उभा आहे आणि त्याची साक्ष सुनेत्राताई देत आहेत. त्यामुळे बारामतीची जनता त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. अनेक संघटना आणि नागरिकांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. अशा दुःखद प्रसंगी ही परंपरा जपली गेली पाहिजे, असे ठाम आवाहन त्यांनी केले. मात्र कोणीही निष्काळजी राहू नये निवडणूक लागलीच तर मैदानात उतरून पूर्ण ताकदीने लढायचे, असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.


अजितदादांच्या कामाची खरी पोचपावती सुनेत्राताईंच्या दणदणीत, विक्रमी विजयातूनच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. अजितदादांची कार्यशैली म्हणजे काटेकोरपणा आणि वेग यांचे मिश्रण होते. सकाळी लवकर कामाला सुरुवात, वेळेचे अचूक भान, अधिकाऱ्यांनाही सज्ज ठेवणारी कार्यपद्धती ही त्यांची ओळख होती. छोट्या-छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत सार्वजनिक पैशाचा प्रत्येक रुपया जनतेच्या उपयोगात यावा, यासाठी ते आग्रही असायचे. “जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही” असे ठामपणे सांगणारा त्यांचा स्पष्टवक्तेपणा आजही सर्वांना आठवतो.


ते राजकारणात नसते तर अत्यंत उत्कृष्ट अभियंता झाले असते, इतकी त्यांची कामाकडे पाहण्याची दृष्टी भक्कम होती. सर्वसामान्यांच्या दुःखाशी नाळ जोडणारा नेता आपण गमावला आहे. आता ही मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, जनतेचा विश्वास आणि या भागाचा विकास हे सर्व पुढे नेणे आपले कर्तव्य आहे.


म्हणूनच कोणताही कार्यकर्ता गाफील राहू नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढवून इतिहासातील सर्व विक्रम धुळीस मिळवायचे आहेत. सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी विजयी करून अजितदादांच्या कार्याला खरी सलामी द्यायची आहे, असे ठाम आवाहन त्यांनी शेवटी केले.


यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दत्ता भरणे, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा