मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; सुनेत्रा पवार यांच्या पत्राची दखल, प्रभाग समित्यांच्या सत्तासंतुलनावरून पुणे पालिकेला विचारणा
मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेमुळे प्रभाग समित्यांमधील सत्तासंतुलन बिघडत असल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. या पत्राची तातडीने दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिकेकडे या प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागवला असून नगरविकास विभागाला वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत, महापालिका आयुक्तांनी या रचनेचा आधार काय होता आणि तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सत्तासंतुलनात तफावत निर्माण झाली आहे का, याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरविकास विभागालाही या संदर्भात लक्ष घालण्यास सांगण्यात आले असून, महापालिकेकडून येणाऱ्या अहवालानंतर शासन स्तरावर या पुनर्रचनेत काही बदल केले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






