Monday, August 31, 2026

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११ टक्के नमुने दूषित

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत वाढ होत असून दूषित पाण्याचे प्रमाण मागील तीन वर्षाच्या घटल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या विश्लेषक प्रयोगशाळेकडून सातत्याने पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासून यावर देखरेख ठेवली जाते. एप्रिल २०२३ ते मार्च २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीनुसार दूषित पाण्याच्या नमुन्यांचे एकूण प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. २०२३-२४ मध्ये ०.४६ टक्के, २०२४-२५ मध्ये ०.४६ टक्के, तर मागील आर्थिक वर्षात म्हणजे सन २०२५-२६ मध्ये हे प्रमाण ०.२८ टक्क्यांवर आले आहे. (Mumbai Water Quality)

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या महापालिका विश्लेषक प्रयोगशाळेत अन्न व पाणी नमुन्यांची सुरक्षितता व गुणवत्ता तपासली जाते. जलाशय, जलवितरण प्रणाली आणि विविध भागांतील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची रासायनिक व सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी केली जाते. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. (Mumbai Water Quality)

पश्चिम उपनगरातील एच-पूर्वमध्ये सर्वाधिक दूषित नमुने!

या तीन वर्षांच्या आकडेवारीत काही विभागांमध्ये दूषित पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे समोर आले आहे. २०२५-२६ मध्ये एच-पूर्व विभागात तब्बल ३.११ टक्के नमुने दूषित आढळले. त्यापाठोपाठ बी विभागात ४.०३ टक्के दूषित नमुने आढळल्याची नोंद आहे. आर-मध्य विभागात हे प्रमाण ०.६० टक्के, तर एम-पश्चिम विभागामध्ये ०.२२ टक्के एवढे दूषित पाण्याचे प्रमाण आहे. (Mumbai Water Quality)

तर दुसरीकडे, अनेक विभागांमध्ये दूषित नमुन्यांचे प्रमाण शून्यावर आले आहे. ए, सी, डी, एफ-उत्तर, जी-दक्षिण, एच-पश्चिम, के-उत्तर, एल, एन, पी-उत्तर, पी-दक्षिण आणि टी विभागांत २०२५-२६ मध्ये दूषित नमुन्यांचे प्रमाण शून्य असल्याचे आकडेवारीत दिसते. म्हणजेच २६ पैकी १२ विभागीय कार्यालयाच्या हद्दीत दूषित पाण्याचे प्रमाण शून्य आहे. (Mumbai Water Quality)

‘महापालिकेच्या म्हणण्यानुसार, जुन्या आणि नवीन जलवाहिन्यांमधून तसेच जलाशय, पंपिंग केंद्रे, झडपा आणि इतर योग्य ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेतले जातात. सर्वसाधारणपणे दररोज सुमारे १५० ते १७० जलनमुने, तर पावसाळ्यात अथवा आपत्कालीन परिस्थितीत २०० ते २५० नमुने जलाशय तसेच जलवितरण प्रणालीमधून घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. (Mumbai Water Quality)

पाणी दूषित होण्याची कारणे कोणती?

महापालिकेच्या अहवालानुसार जलवितरण प्रणालीतील जुन्या किंवा नवीन जलवाहिन्या, जोडपाईपमधील गळती, घरगुती नळजोडणी, झडपा आणि योग्य देखभालीचा अभाव यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळेही वितरण प्रणालीतील पाणी दूषित होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी, गळती शोधणे आणि तातडीने दुरुस्ती करणे याला महत्त्व प्राप्त होते. एकीकडे मुंबईच्या पाण्याच्या एकूण गुणवत्तेत सुधारणा होत असताना, काही विभागांतील वाढलेले दूषित नमुन्यांचे प्रमाण महापालिकेसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. (Mumbai Water Quality) दूषित पाण्याच्या नमुन्यांची टक्केवारी : विभाग २०२३-२४--- २०२४-२५----२०२५-२६ सरासरी. ०.४६-------०.४६--------- ०.२८

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा