मे महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे राज्यासह इतर भागांतूनही हजारो पर्यटक वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी क्रमांक १६ (कैलास लेणी) आणि लेणी क्रमांक १० परिसरात मोठी गर्दी असतानाच अचानक मधमाशांचे पोळे हलले आणि मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वत्र धावपळ उडाली.
या हल्ल्यात अनेकांना मधमाशांनी चावे घेतले. जखमींपैकी एका महिलेला मोठ्या प्रमाणात दंश झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी त्या परिसरातील प्रवेश बंद केला आहे. सुट्टीच्या हंगामात घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.