मुंबई : उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला असून, यंदा केरळमध्ये मान्सून सरासरी तारखेपेक्षा पाच दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जूनला मानले जाते. मात्र यंदा २६ मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार असल्याने नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत नैऋत्य मौसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, अंदमान समुद्रात तसेच अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळत असून, अंदमान-निकोबार बेटांवरही यंदा मान्सून साधारण सहा दिवस आधी दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, ‘स्कायमेट वेदर’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरणनिर्मिती सुरू होईल. विशेषतः मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होऊ शकतो. मात्र राज्याच्या अंतर्गत भागात मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
यंदा एल निनोचा प्रभाव जुलै महिन्यापासून जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे साठवण आणि जलसंधारण यावर भर देणे आवश्यक असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. पावसाचे प्रमाण आणि वितरण यावर एल निनोचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पुढील काळात हवामानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
विशेष म्हणजे, भारतीय हवामान विभागाने २००५ ते २०२५ या २१ वर्षांच्या कालावधीत केरळमधील मान्सून आगमनाबाबत केलेले अंदाज बहुतांश वेळा अचूक ठरले आहेत. केवळ २०१५ सालचा अंदाज वगळता उर्वरित सर्व वर्षांमध्ये हवामान विभागाचा अंदाज वास्तवाशी जवळपास जुळला होता. गेल्या वर्षीही केरळमध्ये मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला होता.






