मुंबई : मुंबईतील वर्सोवा-जुहू लिंक रोडवर एका भरधाव बसने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या तसेच बाजूला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात काही काळ भीती, गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसली तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर जुहू-वर्सोवा लिंक रोडवर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या मध्यभागी अडकल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, की निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
या अपघातानंतर मुंबईतील वाढती वाहतूक, भरधाव वेगाने धावणारी वाहनं आणि रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.






