अहमदाबाद : आयपीएल २०२६ च्या अंतिम लढतीसाठी क्रिकेटप्रेमी सज्ज झाले असतानाच हवामानाने पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटून आणले आहेत. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेतेपदासाठी महासंग्राम रंगणार आहे. मात्र, सामन्यापूर्वी गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, अंतिम सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
२०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवावा लागला होता. त्यामुळे यंदाही क्रिकेटप्रेमींच्या मनात त्याच आठवणी ताज्या झाल्या आहेत.
अहमदाबादच्या हवामानाचा अंदाज काय सांगतो?
रविवारी सकाळपासून अहमदाबादमध्ये कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मात्र, हवामान खात्याने गुजरातच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे संध्याकाळी हवामान अचानक बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अॅक्युवेदरच्या अंदाजानुसार सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता कमी असली तरी वातावरणात आर्द्रता अधिक राहणार आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर आणि पश्चिम भारतात हवामानात वेगाने बदल होत असल्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता मैदानाइतकेच आकाशाकडे लागले आहे.
पाऊस पडल्यास सामना कसा होणार?
आयपीएलच्या नियमांनुसार पावसामुळे सामना तात्काळ रद्द केला जात नाही. पंच आणि आयोजक पूर्ण सामना घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात.
ओव्हर्स कमी करून सामना खेळवला जाऊ शकतो :
जर पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला, तर सामन्यातील ओव्हर्स कमी केल्या जाऊ शकतात. निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान ५-५ षटके खेळणे आवश्यक आहे. अंतिम सामन्यासाठी राखीव वेळेची तरतूद असल्याने मध्यरात्रीपर्यंत खेळ सुरू ठेवण्याची मुभा आहे.
राखीव दिवसाची सोय :
रविवारी एकही चेंडू टाकता आला नाही किंवा सामना पूर्ण झाला नाही, तर अंतिम सामना १ जून रोजी राखीव दिवशी खेळवला जाईल. त्यामुळे चाहत्यांना लगेच निराश होण्याचे कारण नाही.
दोन्ही दिवस पाऊस झाला तर काय?
जर दुर्दैवाने मुख्य दिवस आणि राखीव दिवस या दोन्ही दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर आयपीएलच्या नियमांनुसार लीग टप्प्यातील गुणतालिकेचा आधार घेतला जाईल.
या हंगामात गुणतालिकेत आरसीबी गुजरात टायटन्सपेक्षा वरच्या स्थानावर होती. त्यामुळे सामना पूर्णपणे रद्द झाल्यास आणि निकाल शक्य न झाल्यास आरसीबीला विजेता घोषित केले जाईल. त्यामुळे ट्रॉफीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरसीबीला मैदानावर उतरावे लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक संधी :
विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात आरसीबीने गुजरातला दोन वेळा पराभूत केले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात गुजरातकडे हिशेब चुकता करण्याची संधी असेल, तर आरसीबी सलग दुसरे जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
आता सर्वांच्या नजरा नरेंद्र मोदी स्टेडियमवर खिळल्या आहेत. क्रिकेटच्या या महायुद्धात विजेता कोण ठरणार हे मैदानावरील खेळ ठरवेल की पावसाचे ढग, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.