बंगळुरू : कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचा शपथविधी झाला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर राज्यपालांनी डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बंगळुरू येथील लोकभवनात संध्याकाळी शपथविधीचा सोहळा झाला.
कर्नाटकमधील डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये वोक्कालिगा, दलित, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायांना प्रतिनिधित्व देत सामाजिक संतुलन साधल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्वतः वोक्कालिगा समुदायाचे आहेत, तर उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर हे दलित आहेत; ही माहिती पण काँग्रेसकडून देण्यात आली.
डॉ. जी. परमेश्वरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोली, कृष्णा बायरे गौडा, प्रियांक खर्गे, यूटी खादर, ईश्वर खांद्रे, यतींद्रामा पाटील आणि सुदरेश पाटील यांनीही कर्नाटक सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
याआधी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी वाढू लागल्याचे पाहून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार आणि कर्नाटक काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेअंती डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. पक्ष नेत्यांचे आदेश आल्यानंतर कर्नाटक काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकमत झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळनेतेपदी एकमताने निवड झाली. नंतर शिवकुमार यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी शिवकुमार यांना बुधवार ३ जून २०२६ रोजी संध्याकाळी शपथविधी देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. यानंतर जाहीर केलेल्या सरकारी कार्यक्रमानुसार डी. के. शिवकुमार यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
उत्तम व्यावसायिक डी. के. शिवकुमार
डी. के. शिवकुमार हे १९८९ पासून सलग आठ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. कर्नाटकमधील कनकपुरा मतदारसंघावर त्यांची उत्तम पकड आहे. कनकपुराचे रॉकस्टार किंवा कनकपुरा बांदा या नावांनीही ते ओळखले जातात. राजकारणी असण्याव्यतिरिक्त ते उत्तम व्यावसायिक आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाचे संकटमोचक असेही म्हणतात.






