मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन
मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली असून महापौर रितू तावडे यांनी आज एकाच दिवशी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून या मोहिमेला सुरुवात केली. कांजूरमार्ग क्षेपणभूमीप्रमाणेच शहरातील सर्व क्षेपणभूमी परिसरांमध्ये तसेच गृहसंस्थांच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून नागरी वने विकसित केली जाणार आहेत. या अभियानात प्रत्येक मुंबईकराने किमान एक झाड लावून सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.
सातपेक्षा अधिक स्थानिक आणि पर्यावरणपूरक वृक्षप्रजातींचा यात समावेश असणार आहे. सध्या या परिसरात सुमारे १२ हजार ८०० वनस्पती अस्तित्वात असून नव्या वृक्षलागवडीमुळे या भागाचे रूपांतर मोठ्या नागरी वनात होणार आहे. परिणामी मुंबईच्या हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे. विकासकामांसाठी काही ठिकाणी वृक्षतोड अपरिहार्य ठरत असली तरी त्याची भरपाई करण्यासाठी व्यापक वृक्षलागवड केली जात असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचे धोरण महापालिका राबवत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध ठिकाणी वनक्षेत्र विकसित केले जात आहे. कांजूरमार्गप्रमाणेच मुंबईतील इतर क्षेपणभूमी परिसरांमध्येही अशाच प्रकारचे हरित प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी कांजूर,मुलुंड,नाहूर,भांडुप आणि घाटकोपर येथे वृक्षारोपण केले. उपमहापौर संजय घाडी यांनीही कांजुरमार्ग क्षेपणभूमी येथे वृक्ष लागवड केली.






