गोंदिया : महाराष्ट्रात बीड, खेड आणि गोंदिया येथे पाण्यात बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील बोदल जलाशयातील दुर्घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. फिरायला गेलेल्या नऊ मित्रांच्या गटातील दोन तरुणांचा बोट उलटल्याने बुडून (Drowned) मृत्यू झाला, तर सात जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा गावातील ९ युवक संध्याकाळी बोदल जलाशय परिसरात फिरण्यासाठी आले होते. तलावाजवळ फोटो (Photo) काढल्यानंतर त्यांनी मच्छीमारांच्या बोटीतून नौकाविहार (Boat Ride) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जलाशयाच्या मध्यभागी पोहोचताच अचानक बोट (Boat) पलटी झाली आणि सर्वजण पाण्यात पडले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी युवकांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकताच स्थानिक मच्छीमारांनी तातडीने बचावकार्य (Rescue Operation) हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोडे (रा. बरबसपुरा) या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगावजवळील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट बुडाल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. नदी पार करण्यासाठी निघालेली बोट अचानक बुडाल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत प्रमिला शेषराव राठोड (रा. लोणार) यांचा मृत्यू झाला, तर कांताबाई ज्ञानदेव आंधळे (रा. सिंदखेडराजा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय एका अज्ञात महिला भाविकेचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुबाई अर्जुन मावळे (रा. महागाव) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील या सलग जलदुर्घटनांमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.