मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना झालेल्या हँड ग्रेनेडच्या भीषण स्फोटात भारतमातेच्या दोन वीर जवानांना वीरमरण आले आहे. देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असून, यात नवी मुंबईतील ऐरोलीचे विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील शहापूर (ता. कराड) येथील अर्जुन राजेंद्र जाधव यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन्ही हुतात्मा जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, "देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या दोन्ही वीरांच्या कुटुंबीयांच्या दुःखात राज्य सरकार पाठीशी उभे आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Uri Blast)
या दुर्घटनेत शहीद झालेले कराड तालुक्यातील शहापूरचे जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. लष्कराच्या 'बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप'चे जवान असलेल्या अर्जुन यांची सध्या '८ राष्ट्रीय रायफल्स' युनिटमध्ये नियुक्ती होती. त्यांच्या घरात देशसेवेची मोठी परंपरा असून, त्यांचे धाकटे भाऊ ऋषी जाधव हे देखील भारतीय नौदलात कार्यरत आहेत. मुलाचा पहिला वाढदिवस आणि या कौटुंबिक सोहळ्यासाठी त्यांनी १५ जूनपासून सुटीही मंजूर करून घेतली होती. मात्र, सुटीवर येण्यापूर्वीच नियतीने हा घाला घातल्यामुळे संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक वर्षाचा मुलगा, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. (Uri Blast)
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट येथे झालेल्या भीषण स्फोटात कर्तव्य बजावत असताना भारतमातेच्या दोन जवानांना वीरमरण आले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही वीर महाराष्ट्राचे सुपुत्र होते. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील, तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 11, 2026
या स्फोटात वीरमरण आलेले दुसरे जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंदवले येथील रहिवासी असून, ते गेल्या काही काळापासून नवी मुंबईतील ऐरोली येथे वास्तव्यास होते. ऐरोलीत राहत असताना त्यांनी परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध जपले होते, त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद विक्रम चव्हाण यांचे पार्थिव गुरुवारी विमानाने मुंबईत आणण्यात आले असून ते पुण्याच्या खडकी लष्करी छावणीत ठेवण्यात आले आहे. शहीद अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण या दोन्ही शहिदांचे पार्थिव शुक्रवारी (१२ जून) सकाळी त्यांच्या मूळ गावी आणले जाणार असून, तेथे शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. (Uri Blast)