हे आहेत नवीन नियम
यंदाच्या परीक्षेत उमेदवारांना बुरखा, मास्क, टोपी, दुपट्टा किंवा चेहरा झाकणारी कोणतीही वस्तू घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा आणि चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे उमेदवारांची पडताळणी केली जाणार असल्याने चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक राहणार आहे.
परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. मूळ ओळखपत्र नसल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
कायदेशीर कारवाई केली जाणार..
परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी, फेस रिकग्निशन आणि मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. संशयित उमेदवारांची आधार पडताळणीही केली जाऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीने परीक्षेला बसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदा प्रथमच प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि QR कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. तसेच उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत प्रत्यक्ष सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करणेही आवश्यक असेल.
परीक्षा केंद्र आणि परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, स्मार्टवॉच किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
दिव्यांग उमेदवारांसाठीही नियम बदलण्यात आले आहेत. लेखनिक म्हणून कुटुंबातील सदस्य नेण्यास परवानगी नसून त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी सर्व नियमांचे पालन करूनच परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.