पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस
मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून, पुढील दोन दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे.
यंदाच्या जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ४७ टक्के कमी पाऊस झाला असून, केवळ ५३टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. याचा फटका शेतीला बसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून २ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.