मुंबई : रविवारी मुंबईत दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला. वांद्रे परिसरातील नर्गिस दत्त रोडवर झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक थांबवावी लागली. याच मार्गावरून अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) यांच्या विवाह सोहळ्यासाठी निघालेला अंबानी कुटुंबाचा ताफाही जात होता. त्यामुळे ताफ्याला काही वेळ रस्त्यात थांबावे लागले.
जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. त्यानंतर अंबानी कुटुंबाचा ताफाही नियोजित स्थळी रवाना झाला. (Aamir khan 3rd wedding)
दरम्यान, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचा विवाह सोहळा मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी साध्या आणि खासगी पद्धतीने पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या सोहळ्याला कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील निवडक मान्यवर उपस्थित होते.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता गोवारीकर हे समारंभाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांपैकी होते. पावसामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी विवाह सोहळा नियोजनानुसार पार पडला.
आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हा नवा टप्पा मानला जात आहे. यापूर्वी त्यांचे रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी विवाह झाले होते. दोघांपासून वेगळे झाल्यानंतर आता त्यांनी गौरी स्प्रॅट यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.






