मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासाच्या तिकिटांचे दर आता वाढणार आहेत. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमधील वाढ आणि गाड्यांच्या देखभालीचा वाढता खर्च यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली. या नव्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार असली, तरी यापूर्वी लागू केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pratap Sarnaik)
वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कामकाजावर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला होता. त्यामुळे ही सार्वजनिक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला अखेर दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यामुळे महामंडळाचा एकूणच परिचालन खर्च वाढला आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीमुळे डिझेल, सुटे भाग आणि टायर यांच्या किमती वाढल्याने ही वाढ अपरिहार्य ठरली. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी एसटीवर दाखविलेला विश्वास नेहमीप्रमाणे कायम ठेवावा.- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री






