मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. (Maharashtra Rain)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुलनेने कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Rain Alert)
अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरड कोसळण्याचाही धोका व्यक्त करण्यात आला आहे. (Monsoon Update)
29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने पूर्व विदर्भात जाणवेल. 30 जुलै रोजी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर 31 जुलै रोजी खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. (IMD Alert)
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातही 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सखल भाग, नदी-नाल्यांच्या परिसरात तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (Rain Forecast)