Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून अनेक भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यापैकी काहींनी शिक्षेचा कालावधी पूर्ण करूनही अद्याप मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांसाठी मात्र ही प्रतीक्षा वर्षानुवर्षांची झाली आहे.


गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील लेरका गावातील भावनाबेन सोलंकी यांचे पती महेशभाई सहा वर्षांपूर्वी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. घरातून निघताना त्यांनी पत्नीला, “मी मासेमारीला जातोय, परत येईन. काळजी करू नकोस,” असे सांगितले होते. मात्र त्यानंतर महेशभाई घरी परतलेच नाहीत. काही काळाने कुटुंबीयांना ते पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. महेशभाई आणि भावनाबेन यांचे लग्न झाले तेव्हा भावनाबेन अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. त्यांना दोन मुले आहेत. पतीच्या अनुपस्थितीत त्यांचा पाच महिन्यांचा मुलगा आता मोठ्या भावासोबत शाळेत जात आहे. महेशभाईंच्या आईचेही निधन झाले असून, पत्नी आणि मुले अंथरुणाला खिळलेल्या वडिलांसोबत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत.



गीर सोमनाथमधील कोटडा बंदर गावातील मंजुबेन बारिया यांचीही कहाणी अशीच आहे. त्यांचा २२ वर्षीय मुलगा मयूर २०२१ मध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेला असताना पाकिस्तानी हद्दीत शिरल्यामुळे पकडला गेला. मयूरच्या वडिलांचे त्याच वर्षी निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी मंजुबेन यांच्यावर आली. त्या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि दिवसाला सुमारे ३०० रुपये कमावतात. “प्रत्येक रक्षाबंधनाला त्याच्या बहिणी त्याची वाट पाहतात. पण त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही,” असे त्या सांगतात. मुलाच्या सुटकेसाठी त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी तसेच परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांची मागणी एकच आहे - पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या मच्छीमारांना लवकरात लवकर मायदेशी आणावे. शुक्रवारी गांधीनगर येथे मंजुबेन बारिया, भावनाबेन सोलंकी यांच्यासह गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दीवमधील काही मच्छीमारांच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांची भेट घेतली.


शनिवारी अहमदाबादमध्ये पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी आणि नॅशनल फिशवर्कर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी कैद मच्छीमारांच्या कुटुंबीयांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांनी या मच्छिमारांची सुटका करावी अशी विनंती केली.


मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जतिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीतील मालीर तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार कैद आहेत. त्यापैकी १७८ जणांनी आपली शिक्षा पूर्ण केली असून त्यांचे भारतीय नागरिकत्व निश्चित झाले आहे. त्यामुळे शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमारांना कोणताही विलंब न करता भारतात परत पाठवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, कोविडपूर्व काळात अनेक कैदी त्यांच्या कुटुंबीयांना पत्रे पाठवत होते. मात्र आता त्यांचा पत्रव्यवहारही जवळपास पूर्णपणे बंद झाला आहे.



१४४ मच्छीमार गुजरातचे


पाकिस्तानच्या मालीर तुरुंगातील १९८ भारतीय मच्छीमारांपैकी १४४ जण गुजरातचे, २४ जण दीवचे आणि १८ जण महाराष्ट्राचे असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील बहुतांश मच्छीमारांना भारताकडून वाणिज्यदूतावासाची मदत मिळाली आहे. देसाई यांनी सांगितले की, त्यापैकी १० जणांची शिक्षा १६ जुलै २०२१ रोजी पूर्ण झाली, तरीही ते अजूनही तुरुंगात आहेत. तसेच, ११५ जणांची शिक्षा १६ मार्च २०२२ रोजी, २१ जणांची १७ नोव्हेंबर २०२२ रोजी, १० जणांची ३१ जानेवारी २०२३ रोजी आणि २२ जणांची १८ जुलै २०२४ रोजी पूर्ण झाली, परंतु त्यांची अद्याप सुटका झालेली नाही.



भारताने पाकिस्तानकडे केली सुटकेची मागणी


परराष्ट्र मंत्रालयाने १ जुलै रोजी जारी केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये शिक्षा पूर्ण केलेल्या १८८ भारतीय मच्छीमार आणि नागरी कैद्यांची तातडीने सुटका करून त्यांना भारतात परत पाठवावे, अशी मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली आहे. याशिवाय पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या आणि भारतीय नागरिक असल्याचा विश्वास असलेल्या १३ नागरी कैद्यांना तातडीने वाणिज्यदूतावासात प्रवेश द्यावा, अशी मागणीही भारताने केली आहे. दरम्यान, १ जुलै रोजी दोन्ही देशांनी एकमेकांसोबत सामायिक केलेल्या कैद्यांच्या अद्ययावत यादीनुसार, ५३ पाकिस्तानी मच्छिमार भारतीय तुरुंगात आहेत.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा