मुंबई : कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमी आणि मृतांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कुर्ला भाभा रुग्णालयात एकूण ४ जखमी दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सोहेल अन्सारी (१८) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच मोहम्मद अन्सारी (१४), नईमुद्दीन इक्बाल खान (२८) आणि साजिद अन्सारी (१६) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, राजावाडी रुग्णालयात एकूण १० जणांना आणण्यात आले होते. त्यापैकी ७ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर ३ जणांवर उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये मोहम्मद समीर अन्सारी (१४), साहिल हुसेन अब्दुल काझी (१९), एक अज्ञात व्यक्ती (४५), अबान आरिफ शेख (२), मन्नत आरिफ शेख (४), मर्जिना आरिफ शेख (२७) आणि विकेत रमेश यादव (२७) यांचा समावेश आहे.
तर फराना दिलबर खान (२८), दिलबर अमनुल्ला खान (३८) आणि शमीन मुस्लिम खान (२६) हे तिघे जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेत एकूण ७ जणांचा मृत्यू आणि ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेबाबत पुढील अधिकृत माहिती आणि मृत-जखमींच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून घरांवर दरड कोसळली…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली असून जखमींना आवश्यक उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.