मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून भाजपने गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केला आहे. यासाठी त्यांनी काही व्हिडिओ पुरावेही पत्रकार परिषदेत सादर केल्याचे सांगितले.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देण्याचा आरोप :
पुण्यातील कार्यक्रमासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर दिल्याचे व्हिडिओ समोर आल्याचा दावा भाजपने केला. कार्यक्रमाला उपस्थित राहणे, प्रवासाचा खर्च आणि सोशल मीडियावर कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी पैसे देण्यासंदर्भातील पुरावे असल्याचे नवनाथ बन यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे, याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी (Navnath Ban) केली.
‘३ हजार लोकांसाठी १० कोटींचा खर्च?’
भाजपच्या दाव्यानुसार, सुमारे ३ हजार लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देऊन कार्यक्रमाला आणले जात असेल, तर त्यासाठी अंदाजे ९ ते १० कोटी रुपये खर्च होऊ शकतात. राहुल गांधींच्या राजकीय पुनरागमनासाठी केवळ गर्दी जमवण्यावर एवढा पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केला. “हा पैसा कुठून आला? कोण देत आहे? कोणाच्या माध्यमातून दिला जात आहे? या पैशांचा अधिकृत हिशोब काय आहे?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
फॉरेन फंडिंगपासून कंत्राटांपर्यंत चौकशीची मागणी :
या निधीच्या स्रोताची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. या पैशांचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का, काँग्रेसशासित राज्यांमधील कंत्राटी व्यवहार किंवा कमिशनच्या माध्यमातून पैसा वळवण्यात आला आहे का, तसेच कोणत्या संस्था किंवा व्यक्तींमार्फत निधी वितरित करण्यात आला, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. (Navnath Ban)
काँग्रेसला भाजपचे थेट सवाल :
- पुण्यातील कार्यक्रमासाठी प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्यामागे नेमके कोण आहे? - सुमारे ३ हजार लोकांसाठी ९ ते १० कोटी रुपये खर्च होत असतील, तर हा पैसा कुठून आला? - या निधीचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का? - कंत्राटी व्यवहार किंवा कमिशनच्या माध्यमातून हा पैसा वळवण्यात आला आहे का? - राहुल गांधींच्या राजकीय रिलाँचसाठी एकूण किती कोटी रुपये खर्च केले जात आहेत?
या सर्व प्रश्नांची काँग्रेसने महाराष्ट्रातील जनता आणि देशातील विद्यार्थ्यांसमोर उत्तरे द्यावीत, अशी मागणी नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केली.






