नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्राम आणि मंडप व्यवस्थेचा आढावा घेतला. तात्पुरत्या सुविधा, पाणी-वीज, स्वच्छता, निचरा, सुरक्षा, आरोग्य आणि विविध विभागांमधील समन्वय यांचे एकात्मिक नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. २०१५च्या कुंभमेळ्यात प्रत्यक्ष काम केलेले निवृत्त महापालिका अधिकारीही बैठकीत सहभागी झाले.
साधुग्राममधील आखाड्यांचे मंडप, पंडाल, सार्वजनिक निवास व्यवस्था, कुंभमेळा व सेक्टर कार्यालये, व्हीआयपी कॅम्प यांसह पाणीपुरवठा, वीज, मलनिस्सारण, स्वच्छता, निचरा, रुग्णालये, प्रथमोपचार, पोलिस आणि अग्निशमन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
२०१५च्या अनुभवाचा नियोजनात उपयोग
निवृत्त शहर अभियंते सुनील खुने, यू. बी. पवार, आर. के. पवार, एस. आर. वंजारी आणि निवृत्त कार्यकारी अभियंता जी. एम. पगारे यांनी २०१५च्या कुंभमेळ्यातील प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या सूचना मांडल्या. मागील मेळ्यातील अडचणी, प्रभावी ठरलेल्या व्यवस्था आणि यावेळी आवश्यक बदल यांचा नियोजनात समावेश करण्यावर भर देण्यात आला.
मंडप व्यवस्थेसाठी नोडल यंत्रणा निश्चित करणे, विविध विभागांसाठी समान साहित्याची एकसमान निविदा पद्धतीने खरेदी करणे, तसेच मीडिया सेंटर, रुग्णालये, पोलिस आणि अग्निशमन विभागांच्या गरजांचा विचार करण्याबाबतही चर्चा झाली.
आयुक्त शेखर सिंह यांनी २०१५च्या अनुभवातून मिळालेले धडे नियोजनाच्या टप्प्यातच समाविष्ट करून सिंहस्थ २०२७साठी अधिक सक्षम आणि समन्वयित साधुग्राम व्यवस्था उभारण्यावर भर दिला.