बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करणाऱ्या भाविकांना भरधाव कारने चिरडले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. (Bihar Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, सहा जण रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करत होते. त्याचवेळी भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, कार सुमारे ५० मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली. (Accident News)
अपाघतग्रस्त मृतांची नावे समोर
या अपघातात टिलो दास (६५), राजो दास (५०) आणि सुरेंद्र यादव (४५) यांच्यासह एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात संताप व्यक्त केला. पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
कार पोलिसांच्या ताब्यात
पिपरा पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, सुपौलचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. प्रशासनाकडून बाधित कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जात आहे.