मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
एमपीएससीने २९ जुलै २०२५ रोजी औषध निरीक्षक पदासाठी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलैदरम्यान घेण्यात आल्या.
मुलाखती पूर्ण झाल्यानंतर ४८५ पात्र आणि तीन अपात्र अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
दरम्यान, २२ मार्चच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी २२ ते २६ जुलैदरम्यान आयोगाला प्राप्त झाल्या. परीक्षेच्या दोन दिवस आधी, म्हणजेच २० मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाले आणि ते सोशल मीडिया अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला होता.
तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने २७ जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालानुसार, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.
परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी तसेच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास अबाधित राहावा, यासाठी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
फेरपरीक्षा कधी होणार?
औषध निरीक्षक पदासाठी आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख आणि इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.






