- आशिष शेलार; मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती नाही
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असला, तरी या निर्णयाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच मंत्र्यांची संमती होती, असे शेलार यांनी स्पष्ट केले. अमराठी चालकांना काहीसा वेळ देणे हा सर्वसमावेशक आणि व्यावहारिक निर्णय असल्याचे सांगत त्यांनी नाराजीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
अमित ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले, तुमचे काका मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीची अंमलबजावणी किंवा कारवाई का केली नाही? कायदा हातात घेण्याऐवजी सर्वांना योग्य ती संधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अडीच वर्षांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद शिवसेनेला मिळणार का, याविषयी विचारले असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत अनौपचारिक बोलले असावेत, त्यावर मी औपचारिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत शेलार यांनी अधिक बोलणे टाळले. मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून अपेक्षेप्रमाणे योग्य ती पावले उचलली जात असल्याचे सांगितले.