मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी जोरदार पावसासाठी आवश्यक हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने दमदार सरींचा जोर दिसून येत नाही. काही भागात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असून, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चांगला पाऊस कधी होणार, याकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Weather)
कोकणात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील 4 ते 5 दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर काही भागांत उष्णताही वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
उत्तर महाराष्ट्रातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दमदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील 4 ते 5 दिवस हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता असून, सध्या या भागासाठी कोणताही विशेष पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. (Weather)
मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे. (Monsoon)
विदर्भातही बहुतांश भागात पुढील 4 ते 5 दिवस हवामान कोरडे, उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. सध्या या भागासाठीही कोणताही विशेष पावसाचा इशारा नाही. ( Mumbai City Weather Update)
एकंदरीत, राज्यात सध्या दमदार पावसाची स्थिती नसून बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ( Mumbai Weather)