Ahilyanagar Crime : नेवाशातील बहुचर्चित वकील रियाज पठाण हत्या प्रकरणात तब्बल १३ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. वकील रियाज पठाण यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या आरोपावरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने नेवाशातील लष्करे टोळीतील सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या खटल्यातील इतर पाच आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी शुक्रवारी (२८ ऑगस्ट) या बहुचर्चित खटल्याचा निकाल दिला. विशेष सरकारी वकील अॅड, उज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी या निकालाची माहिती दिली.(Ahilyanagar Crime News)
७ जणांना मरेपर्यंत जन्मठेप
या प्रकरणात प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे, रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण आणि सादिक बशीर शेख या सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी मोहन सुरेश लष्करे हा खटला सुरू असतानाच फरार झाला असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे कटामध्ये थेट आणि भक्कम सहभाग सिद्ध करणारा पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे आणि सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Ahilyanagar Crime News)
तब्बल १३ वर्षांनंतर निकाल
या संपूर्ण खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. परिमल फळे तसेच पैरवी अधिकारी आणि पोलीस हवालदार महेश जोशी यांनी सहाय्य केले. या हत्याकांडाची घटना २०१३ मध्ये नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी घडली होती. त्यामुळे या प्रकरणाने त्यावेळी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.२०१३ मध्ये नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदिवसा घडलेल्या वकील रियाज पठाण हत्या प्रकरणाचा तब्बल १३ वर्षांनंतर निकाल लागल्याने या प्रकरणाला आता महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे.