पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भुयारी मार्गामध्ये वाहनांवर पाण्याची गळती अद्याप सुरू आहे. भुयाराचे काम पूर्ण झाल्यावर गेल्या पाच वर्षापासून छताच्या बाजूच्या कातळातून ही पाण्याची गळती सुरू आहे.
सततच्या पाणी गळतीमुळे भुयाराच्या आतील रस्ता निसरडा झाला आहे. अपघाताचा धोका वाढला आहे. गळती रोखण्यासाठी कोटिंग करण्याचा प्रयत्न झाला. पण हा प्रयोग अयशस्वी झाला असून अद्याप गळती सुरू आहे. आता गळणारे पाणी थेट रस्त्यावर किंवा वाहनांवर पडू नये म्हणून पन्हाळी लावून ते पाणी मुख्य ड्रेनेज लाईनद्वारे भुयाराबाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण अद्याप गळती बंद करणारा उपाय करण्यात यश मिळालेले नाही.
नियमानुसार कंत्राटदार कंपनीवरच गळती बंद करण्यासाठी मोफत दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या दुरुस्तीसाठी स्वतंत्र किंवा वेगळा अतिरिक्त खर्च घोषित झालेला नाही.
सद्यस्थितीत कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी आधुनिक व्हेन्टीलेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून हाय-टेक एलईडी पथदीप आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ११ केव्ही वीज पुरवठ्यासह जनरेटर बॅकअप देखील ठेवण्यात आले आहे. दोन्ही भुयारी मार्गाला अंतर्गत जोडणारे आपत्कालीन रस्ते आहेत. मात्र,गळतीची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणि योग्य तांत्रिक तोडगा काढण्यासाठी 'आयआयटी'च्या तज्ज्ञांची मदत घेऊन दोन्ही भुयारी मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येऊनही गळती सुरुच आहे.
लवकरच गळती कायमची बंदी करण्यासाठी उपाय केले जातील, असे 'एसडीपीएल'चे अमोल शिवतारे यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी आणि अमोल माडकर यांनी 'एसडीपीएल'चे अमोल शिवतारे यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला. पण गळती नेमकी कधीपर्यंत थांबवणार याबाबत ठामपणे कोणीही काहीही सांगितलेले नाही.