Wednesday, September 2, 2026

Disha Salian CBI probe : 'आता तरी सत्य बाहेर येईल ही १००% आशा', मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया

Disha Salian CBI probe : 'आता तरी सत्य बाहेर येईल ही १००% आशा', मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर दिशाच्या वडिलांची प्रतिक्रिया

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant Singh Rajput) याची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Saliyan) हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणात तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानंतर दिशाचे वडील सतीश सालियन यांनी प्रतिक्रिया दिली असून, "सत्य बाहेर येईल अशी मला १०० टक्के खात्री होती," असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या सहा वर्षांपासून आमचा हा कायदेशीर लढा सुरू असून एफआयआर दाखल झाल्यानंतरच मी माझे दुःख व्यक्त करेन, असेही त्यांनी सांगितले.

'एफआयआर दाखल झाल्यावरच मी रडेन' : सतीश सालियन (Satish Salian) 

न्यायालयाच्या या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सतीश सालियन भावूक झाले. "मी आधीच एक गोष्ट ठरवली होती आणि आजही तीच सांगतो; जोपर्यंत या प्रकरणात अधिकृत एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत मी अश्रू गाळणार नाही. एकदा एफआयआर दाखल झाला की मगच मी घरी जाऊन मोकळा श्वास घेईन आणि रडेन," असे ते म्हणाले. यासोबतच पूर्वी दिलेल्या तक्रारीत ज्यांची नावे समाविष्ट होती, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. "ज्यांनी चूक केली आहे त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल. आपण कोणाला शिक्षा देत नाही, तर वरील ईश्वरच न्याय करतो," असे मत त्यांनी व्यक्त केले.

उच्च न्यायालयाचे सीबीआयला महत्त्वपूर्ण निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने बुधवारी या तपासाचे सूत्रे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले. सीबीआयच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तपासासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून घ्यावा आणि रीतसर एफआयआर नोंदवावा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दिशाच्या मृत्यूमागील सर्व शक्यतांची आणि परिस्थितीची बारकाईने चौकशी करण्याचे निर्देशही तपास अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. मात्र, पुरेसे पुरावे आणि संशय निर्माण होईपर्यंत कोणालाही थेट आरोपी मानले जाऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

२०२० मधील घटना अन् राज्य सरकारची भूमिका

दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका निवासी इमारतींच्या १४ व्या मजल्यावरून पडल्याने झाला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसाकांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद केली होती आणि नंतर ती आत्महत्या असल्याचे सांगत तपास बंद केला होता. राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, आधीच्या तपासात कोणताही कट किंवा गुन्हा घडल्याचे पुरावे मिळालेले नाहीत आणि पाच वर्षांनंतर न्यायालयात दाद मागण्यास उशीर झाला आहे. मात्र, न्यायालयाने हा दावा फेटाळत म्हटले की, अचानक मुलगी गमावल्याच्या धक्क्यातून आई-वडिलांना सावरण्यास वेळ लागणे स्वाभाविक आहे. तसेच, प्रशासनाने स्वतः ३-४ वर्षांनंतर या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केली होती, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

वकिलांनी आदित्य ठाकरेंसह इतरांवर केले गंभीर आरोप

सतीश सालियन यांचे वकील अॅड. निलेश ओझा (Nilesh Oza) यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप ओझा यांनी न्यायालयात केला होता. त्यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे मुख्य आरोपी म्हणून घेतली आहेत. "आम्ही दाखल केलेल्या तक्रारीत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली,(Suraj Pancholi)  डिनो मोरिया, (Dino Moriya) आदित्य ठाकरेंचा अंगरक्षक, रिया चक्रवर्ती, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांना प्राथमिक आरोपी म्हणून नमूद केले आहे," असा दावा अॅड. ओझा यांनी केला. न्यायालयाने मालवणी पोलिसांना सर्व कागदपत्रे आणि पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. तपासात गुन्हा सिद्ध झाल्यास सीबीआय न्यायालयात अहवाल सादर करेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >