Wednesday, September 2, 2026

Nashik : नाशिकमध्ये भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे विशेष प्रशिक्षण, नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Nashik : नाशिकमध्ये भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे विशेष प्रशिक्षण, नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून भूकंपाचे हलके धक्के सातत्याने जाणवत आहेत. प्रामुख्याने पेठ, दिंडोरी, सुरगाणा आणि कळवण तालुक्यांमध्ये भूकंपाच्या घटना नोंदवल्या जात आहेत. वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भूकंपाची तीव्रता वाढल्यास नेमकी कोणती खबरदारी घ्यावी आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःसह इतरांचे प्राण कसे वाचवावेत, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF पुणे यांच्या सहकार्याने पेठ आणि दिंडोरी तालुक्यात विशेष प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

भूकंपासह विविध नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, आपत्तीपूर्व तयारी कशी करावी आणि आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बचाव कसा करावा, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. पेठ तालुक्यातील इनामबारी येथे एनडीआरएफच्या पथकाने नागरिकांना भूकंपाच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीची माहिती दिली. भूकंपाचे धक्के जाणवत असताना घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी कसे जायचे, इमारतीमध्ये असल्यास कोणती काळजी घ्यायची, तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या उपाययोजना करायच्या, याबाबत पथकाने मार्गदर्शन केले. यावेळी विविध आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये बचावकार्य कशा पद्धतीने केले जाते, याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही NDRFच्या जवानांकडून करून दाखविण्यात आली. आपत्तीच्या वेळी नागरिकांनी प्रशासन आणि बचाव पथकाला सहकार्य कसे करावे, याबाबतही माहिती देण्यात आली.

दिंडोरी तहसील कार्यालयातही मार्गदर्शन

दिंडोरी तहसील कार्यालयातही आपत्ती व्यवस्थापनाबाबत विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात भूकंप, आग, पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत NDRFच्या पथकाने सविस्तर माहिती दिली. आपत्ती येण्यापूर्वी आवश्यक तयारी करणे, आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता शांतता राखणे, परिस्थितीनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आणि आपत्तीनंतर बचाव व मदतकार्यात प्रशासनाला सहकार्य करणे, या बाबींवर विशेष भर देण्यात आला. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता किंवा घटना रोखणे शक्य नसले, तरी योग्य पूर्वतयारी, प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून संभाव्य जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते. याच उद्देशाने पेठ आणि दिंडोरी तालुक्यात हे विशेष प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि भूकंपाचे धक्के जाणवल्यास घाबरून न जाता सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >