Wednesday, September 2, 2026

Jalgaon Crime : अपहरण - अत्याचाराच्या आरोपानंतर मोठा ट्विस्ट, मुलासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत तरुणी तीन महिन्यांनी आरोपीच्या घरी

Jalgaon Crime : अपहरण - अत्याचाराच्या आरोपानंतर मोठा ट्विस्ट, मुलासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत तरुणी तीन महिन्यांनी आरोपीच्या घरी

Jalgaon Crime : अपहरण करून गुंगीचे औषध पाजल्याचा, बेशुद्धावस्थेत आळंदी येथे विवाह लावल्याचा आणि पुण्यात अत्याचार केल्याचा आरोप करत एका तरुणासह त्याच्या कुटुंबातील १० जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार देणारी तरुणी तब्बल तीन महिन्यांनंतर पुन्हा संबंधित तरुणाच्या घरी पोहोचली आहे. या घटनेमुळे रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तरुणीने पोलिसांसमोर दिलेल्या सध्याच्या जबाबात आपण सज्ञान असून स्वतःच्या इच्छेने संबंधित तरुणासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे लेखी नमूद केले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गंभीर आरोपांच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तरुणीच्या बदललेल्या भूमिकेमुळे पोलिसांसमोरही या प्रकरणातील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. (Jalgaon Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

रावेर तालुक्यातील एका गावातील तरुणाविरुद्ध तसेच त्याचे भाऊ, चुलतभाऊ, वहिनी, वडील, काका आणि मावसभाऊ अशा कुटुंबातील एकूण १० जणांविरुद्ध संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार, हतनूर पुलाजवळून आपले अपहरण करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला होता. त्यानंतर आपल्याला गुंगीचे औषध पाजण्यात आले आणि बेशुद्धावस्थेत आळंदी येथे नेऊन संबंधित तरुणासोबत विवाह लावण्यात आल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पुणे येथे आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचाही आरोप तिने आपल्या तक्रारीत केला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच १ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आरोपी तरुणाच्या घरी आल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पथक संबंधित ठिकाणी पाठवले. पोलिसांनी तरुणीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला. यावेळी दोन्ही कुटुंबीयांनाही पोलिसांनी बोलावून घेतले. मात्र, या वेळी तरुणीने पूर्वीच्या तक्रारीपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे समोर आले.(Jalgaon Crime News)

पोलिसांसमोर ‘स्वेच्छेने राहणार’ असा जबाब

पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात तरुणीने आपण सज्ञान असल्याचे स्पष्ट केले असून, संबंधित तरुणासोबत स्वतःच्या इच्छेने राहण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. तसेच, आई-वडिलांशी चर्चा करण्यासही तिने नकार दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले गंभीर आरोप आणि आता पोलिसांसमोर नोंदवण्यात आलेला सध्याचा जबाब यामध्ये स्पष्ट फरक दिसून येत आहे. तरुणीच्या या बदललेल्या भूमिकेमुळे पोलिसांकडून पूर्वीची तक्रार, त्यावेळी नोंदवलेले आरोप, सध्याचा जबाब तसेच संबंधित व्यक्तींकडून मिळणारी माहिती यांचा कायदेशीर प्रक्रियेनुसार विचार केला जाणार आहे.

या प्रकरणात तरुणीने पूर्वी केलेल्या आरोपांची आणि आता पोलिसांसमोर दिलेल्या जबाबाची वस्तुनिष्ठ पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. तपासादरम्यान समोर येणारे पुरावे, संबंधित व्यक्तींचे जबाब, उपलब्ध कागदपत्रे आणि इतर बाबींच्या आधारेच प्रकरणाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. दरम्यान, तरुणीच्या पूर्वीच्या तक्रारीतील गंभीर आरोप आणि त्यानंतर तिने पोलिसांसमोर घेतलेली सध्याची भूमिका यामुळे रावेर तालुक्यात या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >