मुंबई : मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शहर आणि उपनगरांतील विविध दहीहंडी मंडळांना भेटी देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. दिवसभर विविध ठिकाणी हजेरी लावल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा केईएम रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल झालेल्या जखमी गोविंदांची विचारपूस केली. (DahiHandi 2026)
DahiHandi 2026 : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; थरावरून कोसळल्याने नवी मुंबईत गोविंदाचा बळी
नवी मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना मुंबई आणि नवी मुंबईतून दोन अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. थरावरून ...

महापौर रितू तावडे यांनी वरळी, भोईवाडा, घाटकोपर, भांडुप आणि दहिसर येथील प्रमुख दहीहंडी उत्सवांना भेटी दिल्या. या भेटींदरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक आमदार, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. गोविंदा पथकांनी शिस्त आणि सुरक्षितता पाळून सण साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध रुग्णालयांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार एकूण 168 गोविंदा जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात दिवसभरात 42 जखमी गोविंदांना आणण्यात आले होते, त्यापैकी 35 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या 7 गोविंदांवर अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
महापौरांनी उपचाराधीन गोविंदांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व गोविंदांना वेळेत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे कडक निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.






