पुण्यात 'आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद-२०२६' चा दिमाखदार शुभारंभ
पुणे : भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादन म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नाही. तर गुणवत्ता, उत्पादकता, निर्यात, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या सर्व घटकांवर भर देत शेतकरी, वैज्ञानिक, उद्योजक आणि शासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुण्यातील 'यशदा' येथे ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान आयोजित 'डाळिंब परिषद-२०२६' या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही परिषद भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत कार्यरत सोलापूरचे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ रिसर्च ऑन पोमोग्रोनेट आणि राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
डाळिंब संशोधनात पुण्याचे ऐतिहासिक योगदान
कृषीमंत्री भरणे यांनी आपल्या भाषणात डाळिंब संशोधनातील पुण्याच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. १९२१ मध्ये गणेशखिंड येथून कृषी संशोधनाला सुरुवात झाली आणि याच भूमीत प्रसिद्ध 'गणेश' वाण विकसित झाला. पुढे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'भगवा' वाणामुळे डाळिंब लागवडीला मोठे बाळकडू मिळाले. २००५ मध्ये सोलापूर येथे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची स्थापना झाल्यानंतर वाण विकास, रोग-कीड नियंत्रण, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यात क्षेत्रात क्रांती घडवणारे संशोधन झाले आहे.
महाराष्ट्राचा देशात ४३ टक्के वाटा
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पल्या रोखठोक आणि थेट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नागपूरमध्ये आयोजित 'मिडिया ...
सध्या महाराष्ट्रात सुमारे १.०५ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड असून १२.२४ लाख मेट्रिक टन उत्पादन होते. देशाच्या एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे ४३ टक्के इतका मोठा आहे.
शेतकऱ्यांसमोरील आव्हाने आणि धोरणात्मक उपाय
उत्पादन चांगले होत असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न का मिळत नाही, या मूलभूत प्रश्नावर कृषीमंत्र्यांनी प्रकाश टाकला. तेल्या रोगासह विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव, हवामानातील अनिश्चितता, बाजारभावातील चढ-उतार आणि निर्यातीतील अडचणींमुळे शेतकरी अडचणीत आहेत. यावर मात करण्यासाठी केवळ संशोधनावर न थांबता योग्य धोरणात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक बाजारात मागणी वाढवण्यासाठी काढणीनंतरचे व्यवस्थापन, शीतगृह व साठवणूक सुविधा, तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन संपूर्ण मूल्यसाखळी (Value Chain) मजबूत करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे भरणे यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींचा सहभाग
या आंतरराष्ट्रीय परिषदेत इटली, अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या देशांतील नामवंत शास्त्रज्ञांसह महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील डाळिंब उत्पादक सहभागी झाले आहेत. परिषदेला २ हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित असून यामध्ये खालील प्रमुख मुद्द्यांवर सखोल विचारमंथन होणार आहे, जनुकशास्त्र आणि वाण सुधारणा, जैवतंत्रज्ञान आणि हवामानस्मार्ट (Climate-Smart) उत्पादन, पीक संरक्षण आणि रोग नियंत्रण, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया व मूल्यवर्धन तंत्रज्ञान, उद्घाटनानंतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी कृषीमंत्री भरणे यांच्याशी थेट संवाद साधून आपल्या प्रत्यक्ष अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, बागलकोट उद्यानशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू वर्धन, आयसीएआरचे (नवी दिल्ली) सहायक महासंचालक डॉ. विश्व बी. पटेल, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, तसेच डॉ. प्रशांत बोडके, डॉ. गोरक्ष ससाणे आणि डॉ. सात्ताप्पा खरबडे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.





