Wednesday, September 9, 2026

Gaurav Bhatia : CJP ला मोठा झटका! AI जनरेटेड फेक फोटो भोवला; भाजपच्या गौरव भाटियांचा २ कोटींचा मानहानीचा खटला!

Gaurav Bhatia : CJP ला मोठा झटका! AI जनरेटेड फेक फोटो भोवला; भाजपच्या गौरव भाटियांचा २ कोटींचा मानहानीचा खटला!

नवी दिल्ली : युवा आणि 'Gen Z' राजकारणाचा दावा करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Chockroach Janta Party) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी सीजेपीचे प्रमुख नेते अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. सोशल मीडियावर बनावट आणि चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी सीजेपीच्या नेत्यांवर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

एआयच्या (AI) मदतीने बनावट माहिती पसरवल्याचा आरोप

हा संपूर्ण विवाद सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे सुरू झाला. सौरव दास यांनी 'X' (ट्विटर) वर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले एक बनावट ग्राफिक पोस्ट केले होते. यामध्ये गौरव भाटिया यांनी स्वातंत्र्य भारद्वाज यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. गौरव भाटिया यांनी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले आणि सौरव दास यांना पोस्ट हटवून २४ तासांच्या आत बिनशर्त माफी मागण्याचा इशारा दिला. त्यानंतर सौरव दास यांनी ती पोस्ट एआय-जनरेटेड असल्याचे सांगत डिलीट केली, मात्र तरीही गौरव भाटिया यांना प्रक्षोभक प्रश्न विचारून वाद वाढवण्याचा प्रयत्न केला.

सीजेपीच्या इतर नेत्यांकडून अपप्रचार कायम

मूळ पोस्ट हटवल्यानंतरही सीजेपीच्या इतर नेत्यांनी ही दिशाभूल करणारी माहिती पुढे पसरवणे सुरूच ठेवले. सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी ते बनावट पोस्टर पुन्हा रिपोस्ट केले, तर पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनीही या चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे सीजेपीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा ठपका ठेवत गौरव भाटिया यांनी कोर्टात धाव घेतली.

'सोशल मीडिया ट्रायल नाही, आता कोर्टातच उत्तर द्यावे लागेल!'

मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर गौरव भाटिया यांनी सीजेपीच्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. "आता या प्रकरणाचा फैसला सोशल मीडियावरील चर्चेतून होणार नाही, तर न्यायालयाच्या चौकटीतच होईल. जेव्हा विरोधाची पातळी ओलांडून बदनामी केली जाते, तेव्हा कायद्याचा बडगा उगारणे गरजेचे बनते," असे भाटिया यांनी स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयात 'Gaurav Bhatia vs Saurav Das & Ors' या नावाने हे प्रकरण नोंदवले गेले आहे.

स्टंटबाजी आणि डिजिटल राजकारणावर प्रश्नचिन्ह

कॉकरोच जनता पार्टीने आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून तरुणांमध्ये (Gen Z) प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी 'एआय' सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट माहिती पसरवणे सीजेपीच्या अंगलट आले आहे. न्यायालयातील या २ कोटींच्या मानहानीच्या खटल्यामुळे सीजेपीच्या डिजिटल रणनीतीवर आणि त्यांच्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >