Thursday, September 10, 2026

Navnath Ban : ‘सूर्य्यावर थुंकण्यासारखेच!’ रवींद्र चव्हाणांवरील आरोपांवर भाजप आक्रमक; नवनाथ बणांचे मनसेला चोख प्रत्युत्तर

Navnath Ban : ‘सूर्य्यावर थुंकण्यासारखेच!’ रवींद्र चव्हाणांवरील आरोपांवर भाजप आक्रमक; नवनाथ बणांचे मनसेला चोख प्रत्युत्तर

Mumbai : राजकीय आंदोलनांतून दाखल झालेल्या खटल्यांचा दाखला देत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ असल्याचे सांगत, हे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.(Navnath Ban)

रविंद्र चव्हाण कल्याण-डोंबिवलीत काय काम करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे, असे सांगत नवनाथ बन म्हणाले की, राजकीय आंदोलनांतून चव्हाणांवर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातही ते स्पष्ट आहे. जनतेसाठी केलेल्या संघर्षातून हे गुन्हे दाखल झाले होते, तर दुसरीकडे गजानन काळे यांच्यावर महिलांनी अनेक गंभीर आरोप केले असून त्यांच्यावर अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत, अशी टीका त्यांनी केली.(BJP vs MNS)

गजानन काळे यांच्यावर टीका करताना बन म्हणाले की, रविंद्र चव्हाण अनेकदा जनतेतून निवडून आले आहेत, परंतु काळे आणि त्यांच्या नेत्यांना कधीही जनतेमधून विजय मिळवता आला नाही. "देवाभाऊंचा 'कॉम्प्लान बॉय' असणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे; असंस्कारी आणि अत्याचारी असण्यापेक्षा देवाभाऊंचा 'कॉम्प्लान बॉय' असणे केव्हाही चांगले," असे प्रत्युत्तर बन यांनी दिले. तसेच, खंडणी वसुली आणि महिलांवरील अत्याचाराचे धंदे आपण करत नाही, असे म्हणत त्यांनी काळे यांच्या भूतकाळावर ताशेरे ओढले.

यावेळी नवनाथ बन यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले. हिंमत असेल तर अमित ठाकरे यांनी स्थळ, वेळ आणि विषय ठरवावा, कुठलेही पुस्तक किंवा कागद न घेता भाजपाचा सामान्य कार्यकर्ताही चर्चेसाठी तयार आहे, असे आव्हान त्यांनी दिले. चार लोकांमध्ये भाषण विसरणाऱ्यांनी भाजपाला आव्हान देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.(BJP vs MNS)

राज ठाकरे आणि मनसेवर निशाणा साधताना बन म्हणाले की, मनसेचे रेल्वे इंजिन ट्रॅकवरून घसरले असून जनतेने त्यांचे दुकान बंद केले आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकांवर टीका करताना त्यांना दहीहंडीपेक्षा मटण हंडी प्रिय असल्याचा शाब्दिक बाण त्यांनी मारला. दादरमध्ये अमित ठाकरेंचे डिपॉझिट जप्त होणे आणि महापालिका निवडणुकीत भोपळाही न मिळणे म्हणजे दुकान बंद होणे होय, असा हल्लाबोल त्यांनी केला.(Navnath Ban)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >