Sunday, September 13, 2026

Dahisar Bhayandar Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर-भाईंदर सागरी मार्गाचं काम वेगात; ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत

Dahisar Bhayandar Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर-भाईंदर सागरी मार्गाचं काम वेगात; ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत

मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी आणि उत्तर मुंबईतील प्रवास अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेकडून दहिसर-भाईंदर सागरी मार्गाचं काम वेगाने सुरू आहे. तब्बल २ हजार ३३७ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दहिसर ते भाईंदर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या सुमारे ४५ मिनिटे लागणारा हा प्रवास भविष्यात अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. (Dahisar Bhayandar Coastal Road)

मुंबई कोस्टल रोड (उत्तर) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरबदल आणि जोडरस्त्यांसह सुमारे ६ किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पामुळे वेसावे ते भाईंदरदरम्यानचा किनारी मार्ग थेट जोडला जाणार असून, उत्तर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून आतापर्यंत ६० पिलर, ५ पाईल कॅप आणि ४ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. (Dahisar Bhayandar Coastal Road)

सात टप्प्यांत प्रकल्पाची उभारणी

मुंबई किनारा रस्ता उत्तर प्रकल्पाचं काम एकूण सात टप्प्यांत करण्यात येत आहे. यामध्ये ‘ए’ ते ‘एफ’ असे सहा टप्पे आणि दहिसर-भाईंदर जोडरस्त्याचा स्वतंत्र टप्पा अशा पद्धतीने संपूर्ण प्रकल्पाची विभागणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पातील सुमारे ३.८३ किलोमीटर लांबीचा आणि ४५ मीटर रुंदीचा उन्नत मार्ग हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. या एलिव्हेटेड रोडच्या उभारणीमुळे किनारी मार्गाची जोडणी अधिक वेगवान आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. या कामासाठी लवकरच ‘लाँचिंग गर्डर’ बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे. (Dahisar Bhayandar Coastal Road)

डिसेंबर २०२८ चे टार्गेट

प्रकल्पस्थळाची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्यासोबतच सुरक्षेच्या नियमांचे कडक पालन करण्याचे आदेश दिले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे, मीरा-भाईंदर महापालिकेशी उत्तम समन्वय ठेवणे, आणि काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बॅरिकेडिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा संपूर्ण सागरी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत खुला करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. (Dahisar Bhayandar Coastal Road)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >