मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली असून मध्यरात्रीपासून शहरातील अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवरही पावसाचे सावट निर्माण झाले आहे. (Mumbai Rain)
आज मुंबईकर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी शेवटच्या टप्प्यातील खरेदी आणि तयारी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांना खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीसह गणपती मंडप आणि सजावटीच्या कामांवर होण्याची शक्यता आहे.
नागपूर : नागपूरमध्ये OYO हॉटेल, लॉज आणि इतर हॉटेल चालकांसाठी पोलिसांनी कडक नियमावली लागू केली आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची योग्य पद्धतीने नोंद ...
कल्याण-डोंबिवली परिसरातही तब्बल दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच पाऊस आल्याने मंडप उभारणी आणि सजावटीच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. (rain news)
वसई-विरारमध्येही रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. वसई, नालासोपारा आणि विरारमधील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. गणपतीच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू असतानाच पावसामुळे गणेशभक्तांची चांगलीच धावपळ होत आहे. मूर्ती आणि सजावटीचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांकडून प्लास्टिकचा वापर केला जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांत 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिकसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा होण्याचा अंदाज आहे.






