लातूर : लातूर शहरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाजवळील एका बिर्याणी हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. (Latur Crime)
जुन्या वादातून तरुणावर सपासप वार
ही घटना 16 सप्टेंबर रोजी रात्री पावणे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परळी येथून काही तरुण लातूरमधील संबंधित हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्याचवेळी फॉर्च्युनर वाहनातून आलेल्या दुसऱ्या गटातील काही तरुणांशी त्यांचा सामना झाला. दोन्ही गटांमध्ये यापूर्वीपासून वाद असल्याचे सांगितले जात आहे. हॉटेलमध्ये जुन्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. (Murder )
अहमदाबाद: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ...
रुग्णालयात नेण्यापूर्वीच एकाचा मृत्यू
वाद वाढल्यानंतर दुसऱ्या गटातील तरुणांनी वाहनातून कोयता बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात बाबा अली शेख, रा. परळी, हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. हल्ल्यामागे नेमके कारण काय होते, दोन्ही गटांमध्ये पूर्वीपासून कोणता वाद होता आणि हा हल्ला आधीच ठरवून करण्यात आला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी छत्रपती शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. सणासुदीच्या काळात शहरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.