Friday, September 18, 2026

BMC : मुंबईत वायू प्रदुषणाची भीती, महापालिका यंत्रणा अलर्ट

BMC : मुंबईत वायू प्रदुषणाची भीती, महापालिका यंत्रणा अलर्ट

येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवणार

मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक

महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विविध विभागांनी उत्तम पूर्वतयारी करुन सज्जतेने कामकाज केल्यामुळे पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजना प्रभावीपणे दिसून आल्या. श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगाने देखील उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तरीही, आगामी काळात वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम नियोजन करून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करावी. येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या प्रकल्पांभोवती आवरण लावणे आदी बाबींची पूर्तता करावी. वायू गुणवत्ता निर्देशांक वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. (BMC)

मुंबई महानगरपालिकेचे विविध विभाग, खात्यांचे कामकाज, प्रकल्प आणि उपक्रम आदींबाबत महानगरपालिका मुख्यालयात १८ सप्टेंबर २०२६ रोजी मासिक आढावा बैठक पार पडली. यावेळी भिडे बोलत होत्या.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग, उप आयुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, विभाग प्रमुख, खाते प्रमुख, संचालक आदी यावेळी उपस्थित होते. (BMC)

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात

सध्या मुंबईत वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नियंत्रणात आहे. तरीही, आगामी काळातही त्यात वाढ होऊ नये आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागू नये. यासाठी, वेळीच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने, महानगरपालिकेकडून जारी २८ मुद्यांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन होईल, हे सुनिश्चित करावे. येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या प्रकल्पांभोवती आवरण लावणे आदी बाबींची पूर्तता करावी. वायू गुणवत्ता निर्देशांक वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. (BMC)

पादचारी प्रथम अभियानाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीत सातत्य ठेवावे

सुलभ आणि अडथळामुक्त पदपथांच्या अनुषंगाने, महानगरपालिकेकडून 'पादचारी प्रथम' अभियान उत्तमप्रकारे राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेने यासाठी सुमारे ३०७ किलोमीटर लांबीच्या २०० पदपथांची निवड केली आहे. सदर पदपथांवरील अडथळे दूर करून ती पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यासाठी सुलभ करण्यात आल आहेत. या अभियान अंतर्गत विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) करण्यात आलेल्या कार्यवाहीचे दृश्य परिणाम जाणवत आहेत. तरीही, हे अभियान अधिक व्यापक आणि प्रभावी होण्यासाठी कार्यवाहीत सातत्य ठेवावे, असे भिडे यांनी सांगितले. (BMC)

‘मार्ग’ प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करावे

नागरी समस्यांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी अत्यंत महत्वाच्या असतात. या तक्रारी आपल्या कामकाजाचा वास्तविक मूल्यमापन करत असतात. त्यामुळे, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना अत्यंत गांभीर्याने घेऊन त्यांचे वेळीच निराकरण करावेत. तक्रारींच्या व्यवस्थापनासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘मार्ग’ प्रणाली आणली आहे. या प्रणालीवर आतापर्यंत ८७ हजार ००४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यापैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. तरीही , ‘मार्ग’ प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी ज्या स्तरावर सोडवल्या जाणे अपेक्षित आहे तिथेच त्यांचे निराकरण करावे, अशा सूचनाही आश्विनी भिडे यांनी यावेळी केल्या. (BMC)

वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर तोडगा काढावा

मुंबईत काही ठिकाणांवर वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. अशाप्रकारचे सुमारे १३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांवरील समस्यांचा योग्यप्रकारे अभ्यास करावा. त्याठिकाणी असलेली बांधकामे रितसर पद्धतीने निष्कासित करुन वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा, असे निर्देशही आश्विनी भिडे यांनी दिले.

प्रकल्पांच्या कामकाजांवर परिमंडळ उप आयुक्तांनी लक्ष द्यावे

रस्ते, पूल, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिनी आदी मध्यवर्ती विभागांकडून मुंबई विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या प्रगतीवर तसेच प्रकल्पांच्या कामकाजावर संबंधित परिमंडळांच्या उप आयुक्तांनी लक्ष द्यावे. जेणेकरुन संबंधित प्रकल्प योग्यप्रकारे आणि विहित वेळेत पूर्णत्वास येतील. तसेच, विविध प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्प बाधितांची (पीएपी) यादी संबंधित विभागांनी विहित वेळेत सादर करावी. त्यामुळे, संबंधित प्रकल्पाला विलंब होणार नाही आणि प्रकल्प विहित वेळेत पूर्णत्वास येईल, असेही आश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले. (BMC)

   
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >