मुरबाड – माळशेज घाटात रस्त्याची कामे करण्यासाठी कामतवाडी, करंजा, वाशिम येथून आलेल्या ४० वर्षीय बबीतीई रमेश चौहान या महिलेच्या डोक्यात डोंगरावरील दगड पडून जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे माळशेज घाटातील प्रवास असुरक्षित बनला असल्याचे सिद्ध झाले आहे.
माळशेज घाटात दिलीप संख्ये यांच्या शिवसाई कन्स्ट्रशनच्या माध्यमातून रस्त्याची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. येथे काम करण्यासाठी यवतमाळ, वाशीम, वाडा, पालघर, मुरबाडमधील आदिवासी भागातील १०० पेक्षा जास्त कामगार कामास आहेत. परंतु, कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीच उपाययोजना नसल्याने मोठय़ा प्रमाणात कामगारांना इजा होत आहेत. त्यातच काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. यवतमाळ, वाशिममधील कामतवाडी, करंजा येथून २० ते २५ महिला व पुरूष तसेच बालकामगार माळशेज घाटातील रस्त्याच्या कामासाठी आलेले आहेत.
त्यापैकी बेबीताई रमेश चौहान ही महिला कामगार सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर डोंगरारून कोसळणा-या पाण्यात हातपाय धुत असताना वरून एक दगड येऊन तिच्या डोक्यात पडला. ती जागीच कोसळून ठार झाली. परंतु, काही तरी उपचार होतील म्हणून तिला टोकावडे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते.
मयत महिला कामगाराच्या वारसांना कंस्ट्रक्शन कंपनी आर्थिक लाभ देण्यास बंधनकारक आहे.
– तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, ठाणे
कामगार डोक्यात हेल्मेट घालीत नाहीत. महिलेच्या नातेवाइकांना विमा मंजूर झाल्यानंतर तसेच आता लगेच आर्थिक मदत करण्यात येईल.
– दिलीप संख्ये, शिवसाई कन्स्ट्रक्शन