Tuesday, September 1, 2026

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'मोदी एक्सप्रेस'च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. कोकणवासीयांच्या विनंतीचा मान राखत, यापूर्वी ९ आणि ११ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार 'मोदी एक्सप्रेस' आता ११ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंत्री नितेश राणे यांच्या वतीने कोकणातील गणेशभक्तांसाठी विशेष 'मोदी एक्सप्रेस' ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, जाहीर करण्यात आलेल्या पूर्वीच्या तारखांमध्ये बदल करण्याची विनंती असंख्य चाकरमान्यांनी केली होती. प्रवाशांच्या या भावनांचा विचार करून आता ही लाडकी 'मोदी एक्सप्रेस' ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून कोकणाच्या दिशेने रवाना होईल. नेहमीप्रमाणे या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी मोफत खाण्या-पिण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईहून निघाल्यानंतर ही ट्रेन रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली असा प्रवास करत सावंतवाडी या तिच्या अंतिम मुक्कामावर पोहोचेल. या विशेष ट्रेनसाठी तिकीट बुकिंग प्रक्रिया २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. प्रवाशांनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षांकडे किंवा रत्नागिरीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर आपली तिकिटे बूक करावीत, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >