मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी
रश्मी शुक्ला यांनी आपला पदभार स्वीकाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पदमुक्त केलं होतं. आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे.
राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजून आला असून राज्यात आता महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.