Tuesday, September 1, 2026

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने शहरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध गणेश मंडळांकडून आकर्षक मंडप, आरती, भजन, प्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, उत्सवातील डीजेचा वाढता वापर आणि काही सांस्कृतिक कार्यक्रमांवरून आता चर्चा सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावर खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarani) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुण्यातील गणेशोत्सवात मोठ्या आवाजात वाजवण्यात येणाऱ्या डीजेला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

“डीजेला माझा विरोध” :

मेधा कुलकर्णी (Medha Kulkarani) म्हणाल्या, “पुण्यातील डीजेला माझा विरोध आहे. लोक दिवसभर काम करून येतात आणि संध्याकाळी हा दणदणाट ऐकावा लागतो.” मोठ्या आवाजातील संगीत आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या ध्वनिक्षेपणामुळे नागरिकांना त्रास होतो, असे त्यांनी म्हटले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिवसभर काम करणाऱ्या नागरिकांना मोठ्या आवाजाचा फटका बसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवरही नाराजी :

गणेशोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या कार्यक्रमांवरही मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. “गौतमी पाटीलचे कार्यक्रमही गणेशोत्सवात ठेवले आहेत, हे चुकीचे आहे,” असे त्या म्हणाल्या. गणेशोत्सवाला मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असल्याचे सांगत त्यांनी उत्सवाचे धार्मिक अधिष्ठान जपण्याची गरज व्यक्त केली. उत्सवाच्या मूळ उद्देशाला आणि भक्तिमय वातावरणाला बाधा येईल, अशा कार्यक्रमांबाबत विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

“गणेशोत्सवाचे धार्मिक अधिष्ठान जपले पाहिजे” :

“धार्मिक अधिष्ठान आपण जपले पाहिजे. लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. गणेशोत्सवाला खूप मोठी परंपरा आहे,” असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले. गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा किंवा जल्लोषाचा उत्सव नसून भक्ती, शिस्त, सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा उत्सव आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे नागरिकांनीही उत्सव साजरा करताना इतरांच्या भावनांचा आणि दैनंदिन जीवनाचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Medha Kulkarani)

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे आधुनिक उत्सव साजरा करताना परंपरा आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखण्याची गरज असल्याची चर्चा या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >