काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी करुन त्याचे कायद्यात रुपांतर करण्याआधीच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मोहम्मद जावेद हे लोकसभेतील काँग्रेसचे व्हीप आहेत. ते बिहारच्या किशनगंजमधून निवडून आले आहेत. विधेयकाचा मसुदा करण्यासाठी सूचना आणि शिफारशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे ते सदस्य होते. आपचे आमदार अमानतुल्ला खान आणि एपीएसआर यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर रविवारी जमियत उलेमा-ए-हिंद आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने २८८ आणि विरोधात २३२ मते पडली, तर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने १३२ आणि विरोधात ९५ मते पडली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर शनिवारी राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी केली. यानंतर देशात एकीकृत वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा, १९९५ अर्थात उमीद कायदा लागू झाला आहे.