देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून, येत्या १६ मे पर्यंत मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर धडकण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन काहीसे लवकर होण्याची चिन्हे दिसत असल्याने, यावर्षी पावसाळा वेळेपूर्वीच सुरू होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या
हवामान विभागाने १३ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती मिळत आहे. समुद्रावरील आर्द्रता, वाऱ्यांचा वेग आणि वातावरणीय दाब हे सर्व घटक मान्सूनच्या प्रगतीला पोषक ठरत आहेत. यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, अंदमानात पाऊस दाखल झाल्यानंतर मान्सूनच्या अधिकृत प्रवासाची घोषणा केली जाईल.
एकीकडे मान्सूनची चाहूल, तर दुसरीकडे उष्णतेचा कहर
मान्सूनचे आगमन जवळ आले असले तरी, उत्तर आणि पश्चिम भारताला सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः राजस्थानमधील बाडमेर येथे तापमानाचा पारा ४८.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. पुढील एक आठवडा मध्य आणि उत्तर भारतात हीच स्थिती कायम राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ ते १९ मे दरम्यान ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि पुद्दुचेरी या भागांतही १७ मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहील. मान्सून पूर्व पावसाच्या या सरींमुळे दक्षिण भारतात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि पश्चिम-मध्य भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता अधिक सक्रिय झाले आहे. या प्रणालीचे रूपांतर 'वेल-मार्क्ड लो प्रेशर एरिया'मध्ये झाले असून, यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. या हवामान प्रणालीचा थेट परिणाम देशातील पावसाच्या वितरणावर होणार असून मान्सूनच्या वेगवान हालचालींसाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर ?
अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे तो केरळच्या दिशेने प्रवास करतो. अंदमानात मान्सून वेळेआधी पोहोचत असल्यामुळे केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर होणार का, याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री होऊ शकते, असे प्राथमिक संकेत मिळत आहेत.