मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ साठी भारताने १२६ जणांच्या संघाची घोषणा केली. पण भारताच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. या अडचणींमुळे भारताचे चार खेळाडू स्पर्धेतून बाद झाले आहेत.मागील दहा दिवसांत डोपिंग प्रकरणामुळे भारताच्या चार खेळाडूंच्यावर बंदी घालण्यात आली आहे. रोइंगमध्ये ऐतिहासिक विश्वचषक पदक जिंकणाऱ्या लाईटवेट पुरुष डबल स्कल्स संघाच्या एका सदस्याला डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने (नाडा) या संघाच्या एका खेळाडूच्या नमुन्यात स्टॅनोझोलॉल नावाचे ॲनाबॉलिक स्टेरॉइड आढळल्यानंतर त्याच्यावर बंदी घातली आहे.
लक्ष्य आणि उज्ज्वल कुनाप सिंह यांनी गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. १९ सप्टेंबरपासून जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये या जोडीकडून पदकाची मोठी अपेक्षा होती.
राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने म्हणजेच नाडाने (NADA) लक्ष्यला स्पर्धेबाहेर असताना डोपिंग चाचणी केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यावर्षी २५ मे रोजी पुण्यात नाडाची परवानगी न घेता डोपिंग चाचणी केल्याचा त्याच्यावर आरोप केला जात आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर लक्ष्यवर चार वर्षांची बंदी घालण्यात येऊ शकते. इतकेच नाही, तर नमुना गोळा केल्याच्या तारखेपासून आतापर्यंतचे सुवर्णपदकासह सर्व निकाल रद्द केले जातील. नोटीसमध्ये नाडाने म्हटले आहे की, "तुम्हाला कळविण्यात येते की, तुमच्या 'नमुना अ' ची चाचणी वाडा (WADA) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा 'नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी' (NDTL), नवी दिल्ली येथे वाडा प्रयोगशाळांसाठी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली आणि त्याचा निकाल 'प्रतिकूल विश्लेषणात्मक निष्कर्ष' (AAF) असा आला आहे." गेल्या १० दिवसांतील भारतातील ही चौथी डोपिंगची घटना आहे. आतापर्यंत अरुण कुमार, तुलिका मान आणि दिलबाग सिंग यांच्यावर डोपिंगप्रकरणी कारवाई झाली आहे.






