राजस्थान : राजस्थानच्या बालोत्रा जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. पत्नीपासून पैसे लपवण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला. जमीन विकून मिळालेले तब्बल 5 लाख रुपये चोरीला जाऊ नयेत म्हणून त्याने शेतात खड्डा खोदून पुरून ठेवले. मात्र, काही काळानंतर पैसे नेमके कुठे पुरले होते, हेच तो विसरला. जवळपास वर्षभरानंतर हे पैसे सापडले, पण तोपर्यंत वाळवीने नोटांची पूर्णपणे नासधूस केली होती. (Rajastan Viral story)
बालोत्रा येथील मांगिलाल मेघवाल यांनी जमीन विकल्यानंतर त्यांना 5 लाख रुपये मिळाले होते. घरात पैसे ठेवल्यास चोरी होण्याची भीती होती. तसेच पत्नी पैसे खर्च करेल, अशीही त्यांना चिंता होती. त्यामुळे त्यांनी कोणालाही न सांगता रोकड एका पिशवीत ठेवली आणि शेतात खड्डा खोदून पुरली. (Viral News)
मात्र, काही दिवसांनंतर मांगिलाल यांना पैसे कुठे पुरले होते, याचा विसर पडला. त्यांनी शेतात बराच शोध घेतला, पण पैसे सापडले नाहीत. अखेर त्यांनी ही बाब पत्नी आणि मुलाला सांगितली. सुरुवातीला कुटुंबीयांना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. मात्र, नंतर त्यांनीही शेतात पैसे शोधण्यास सुरुवात केली. तरीही त्यांना यश आले नाही. (Farmers News)
अखेर पैसे सापडले अन्...
जवळपास एक वर्षानंतर पावसाळ्यात शेतात पेरणी सुरू असताना अचानक जमिनीत पुरलेली पैशांची पिशवी सापडली. पिशवी उघडताच त्यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचे गठ्ठे दिसले. मात्र, नोटांची अवस्था पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. वाळवीने नोटांचे मोठे नुकसान केले होते आणि अनेक नोटांचे तुकडे झाले होते.
यानंतर कुटुंबीय खराब झालेल्या नोटा घेऊन पचपदरा आणि बालोत्रा येथील एसबीआयच्या शाखेत गेले. मात्र, नोटांची अवस्था पाहता बँकेने त्या स्वीकारल्या नाहीत. चोरीच्या भीतीने पैसे लपवण्याचा घेतलेला निर्णय अखेर मांगिलाल यांच्या कुटुंबासाठी लाखोंच्या नुकसानीचे कारण ठरला.