गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळला. भारताच्या ४६२ धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या डावात १७८ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.
सोनल दिनुषा आणि यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला यांनी ६ व्या गड्यासाठी १४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना ताटकळत ठेवले. अखेर प्रसिध कृष्णाने डिकवेलाला ८० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दिनुषाने ७८ व्या षटकात आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर मानव सुथारने प्रभात जयसूर्याला बाद केले, तर पुढच्याच षटकात जडेजाने शतकीवीर दिनुषाला पायचित केले. त्यानंतर सुथारने लाहिरू कुमाराला यष्टिचित करत श्रीलंकेचा डाव संपवला.
श्रीलंकेच्या संघाने फॉलो-ऑन वाचवण्यात यश मिळवले. श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर संपल्यानंतर पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची (स्टम्प्स) घोषणा केली. आता चौथ्या दिवशी भारतीय संघ १७८ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
डिकवेलाचा नकोसा विक्रम : या खेळीमुळे डिकवेलाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक न ठोकता सर्वाधिक ५०+ धावा (अर्धशतके) करण्याचा अनच्छित विक्रम नोंदवला गेला. त्याच्या नावावर आता २३ कसोटी अर्धशतके आहेत, पण एकही शतक नाही. या यादीत भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान १६ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
रवींद्र जडेजाचा ३५० बळींचा टप्पा : रवींद्र जडेजाने केशरा नुवंथाला बाद करत कसोटी कारकिर्दीतील ३५० वी विकेट पूर्ण केली. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच कसोटीत ४,००० पेक्षा जास्त धावा आणि ३५० पेक्षा जास्त बळी घेणारा तो कपिल देव यांच्यानंतर दुसरा भारतीय आणि जागतिक स्तरावर चौथा खेळाडू बनला.






